“नैसर्गिक आपत्तीत मराठी संतांचे मनोविज्ञान” रवींद्र बेम्बरे
पुस्तक -परीक्षण
नैसर्गिक आपत्तीत मराठी संतांचे मनोविज्ञान या पुस्तकाचे प्रकाशन दिनांक 13 जून 2025 रोजी साहित्य भारती द्वारा छत्रपति संभाजीनगर मध्यमे करण्यात आले. या पुस्तकाचे लेखक रविंद्र बेम्बरे यांनी या पुस्तकात नैसर्गिक आपत्तीत मराठी संतांचे मनोविज्ञान या विषयावर अत्यंत अभ्यास पूर्ण व मार्मिक शब्दांत विवेचन केले आहे . पुस्तकावर अभ्यासपूर्ण भाष्य श्री. उपेंद्र कुलकर्णी यांनी केले.न्यायमूर्ती श्री.अंबादासराव जोशी यांनी ही या पुस्तकाविषयी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले कि आजच्या परिस्थितिमध्ये या पुस्तकाचे महत्व अधिक आहे. या पुस्तकाबद्दल जिज्ञासा निर्माण झाल्याने मी ही या पुस्तकाचे वाचन केले.तसेच या पुस्तकाचा परिचय आपणास ही व्हावा म्हणून केलेला हा प्रपंच आहे.सर्वप्रथम लेखकाने आपले मनोगत व्यक्त केले आहे ते म्हणतात कि संत साहित्य म्हणजे चिरंतन सत्याचा शोध असल्यामुले ते कधीच शिले किंवा कालबाह्य ठरत नाही.या पुस्तकात एकूण सात प्रकरणे आहेत. नैसर्गिक आपत्ति संकल्पना आणि स्वरूप,नैसर्गिक आपत्ती आणि मनोविज्ञान : परस्पर संबंध ,भारतीय संत साहित्यातील मनोविज्ञान,नैसर्गिक आपत्तीत संत तुकाराम यांचे मनोविज्ञान,नैसर्गिक आपत्तीत संत रामदास यांचे मनोविज्ञान,कोरोना महामारीत मराठी संतांचे मनोविज्ञाननिष्कर्षात्मक समारोप,शेवटी परिशिष्ट व लेखक परिचय देण्यात आला आहे.
नैसर्गिक आपत्ती म्हणजे निसर्गातील अनपेक्षित, अचानक आणि हानीकारक घटना ज्यामुले मानवी जीवन, पर्यावरण, अर्थव्यवस्था यांना मोठ्या प्रमाणावर बाधित करतात. यात भूकंप, पूर, वादळ, दुष्काळ, ज्वालामुखी, महामारी अशा घटना मोडतात. या आपत्ती केवळ शारीरिक हानी करत नाहीत तर मानसिक, सामाजिक पातळीवरही माणसाला हादरवतात.यामध्ये नैसर्गिक आपत्ती संकल्पना, आपत्तीची व्याख्या, आपत्तीचे प्रकार व शेवटी संदर्भ सूची दिली आहे.नैसर्गिक आपत्तीमुळे माणसाच्या मनोवस्थेत अनेक प्रकारचे बदल घडतात — भीती, चिंता, असुरक्षितता, नैराश्य, शोक आणि अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो. या अवस्थेत मानसिक आरोग्य अत्यंत दुर्बल होते. परंतु अशा स्थितीत आध्यात्मिकता, धर्म, भक्ती हे आधार बनतात. यात मानवी जीवनातील आपत्तीची आटलता महामारीतील जीवितहानी, नैसर्गिक आपत्ती आणि मनोविज्ञान सहसंबंध, आपत्तीचे मानसशास्त्रीय व्यवस्थापन याविषयी अधिक विचार व्यक्त केले आहेत.भारतीय संतसाहित्य केवळ अध्यात्मवादी नसून त्यात मानवी भावनांचा, संघर्षांचा, जीवनदृष्टीचा सखोल अभ्यास आहे. संत परमार्थाचे उपदेश देताना मानवी स्वभाव, मनोव्यथा, सामाजिक व नैतिक आव्हानांची जाणीव बाळगतात. महात्मा बसवेश्वर, श्री चक्रधर स्वामी,संत नामदेव ,संत ज्ञानेश्वर,संत एकनाथ संत तुकाराम संत रामदास, यांच्या साहित्यातील मनोविज्ञानाचा शोध घेतला आहे..संत तुकाराम यांचे जीवनच एक आपत्तीपूर्ण कथा आहे. दुष्काळात त्यांचे घर उद्ध्वस्त झाले, पत्नीसह अनेक कुटुंबीय वारले, समाजाकडून उपेक्षा झाली. यात संत तुकाराम महाराज यांनी अनुभवलेला दुष्काल आणि महामारी,दु:ख आणि संकटे स्वीकारण्याची दृष्टी,मरणाची अटलता, आपत्तीतील मनोधैर्य,विचारार्थ नियंत्रण, चित्त आणि मनाची स्थिरता, चंचल मनाचे स्वयं नियंत्रण, संकटकालीन सावधानता, संकटकालात मानसिक आधार,समाजाची मानसिकता, नैराश्य आणि आत्महत्या याविषयी विवेचन केले आहे.संत रामदास हे कर्मयोग आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक आहेत. त्यांनी दासबोध, मनाचे श्लोक या ग्रंथांमधून मानसिक शिस्त, धैर्य, संयम आणि स्थितप्रज्ञता शिकवली. संकटसमयी मन कोसळू नये. त्यांच्या लेखनात आत्मबल, संयम आणि दृढनिश्चय यांचा मानसशास्त्रीय पाया आहे. आपत्तीसमयी भावनांवर ताबा ठेवणे, विवेकाने निर्णय घेणे आणि सामाजिक कर्तव्य निभावणे ही त्यांची शिकवण आजही प्रासंगिक आहे.यामध्ये संत रामदासाच्या कालातील नैसर्गिक आपत्ती,मृत्यूच्या भीतीची निरर्थकता,दु:ख आणि संकटाची अटलता, मानसिक स्थैर्य आणि धैर्य,संयम आणि संतुलित विचार,सहकार्य आणि समर्पणभाव, सकारात्मक विचार, चिंता आणि भय,श्रध्देचे अधिष्ठान याविषयी सखोल माहिती दिली आहे.कोरोना काळात लॉकडाऊन, मृत्यू, अनिश्चितता आणि भय यामुळे मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम झाला. याकाळात अनेकांनी संत वाङ्मयाकडे मानसिक आधारासाठी वळले.
मराठी संतांचे मनोविज्ञान हे संकट काळात धीर, श्रद्धा, समर्पण आणि सेवा या तत्त्वांवर आधारलेले आहे. त्यांनी आपल्या वाङ्मयातून नैसर्गिक आपत्तींसारख्या प्रसंगातही कसे स्थिर राहावे, हे शिकवले. अशा संतविचारांचा आधार घेतल्यास, कोणतीही आपत्ती मानसिक शांततेने आणि आत्मबलाने पार करता येते. मानसशास्त्रज्ञ प्रीतमकुमार बेदरकर ही या पुस्तकाबद्धल आपला अभिप्राय व्यक्त केला आहे. संत साहित्यातील अनेकविध संदर्भानी समृद्ध बनलेला हा ग्रंथ मराठी वाचक, अभ्यासक आणि संशोधकांना संत साहित्याकडे पाहण्याची एक नवी दृष्टी देतो. या पुस्तकात एकशे दहा पृष्ठे आहेत.पुस्तकाचे मुखपृष्ठ संतोष धोंगडे यांनी बनविले आहे.या पुस्तकाचे प्रकाशन स्नेहवर्धन प्रकाशन पुणे यांनी केले आहे. वाचकांना आग्रह आहे की या पुस्तकाचे जरूर वाचन करावे व आपल्या संग्रही ठेवावी अशी अमूल्य कृती आहे.
ज्ञानोबा देवकत्ते
छत्रपती संभाजीनगर.
मोबाइल नंबर- 9527381007
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें